श्रीरामपूर : शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अपहरण केलेली साखर व ट्रक असा एकूण 28 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुजरात राज्यातून जप्त करत उल्लेखनीय कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रकचालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी इम्रान हबीब पोपटीया (वय 42, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. फातिमा हाऊसिंग सोसायटी, श्रीरामपूर) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, व्यापारी शाम नारायण ठक्कर यांच्या आदेशानुसार मॉ. ट्रेडर्स, उल्हासनगर येथे 24 टन साखर पोहोचविण्यासाठी त्यांनी तुकाराम फुंदे यांच्या अशोक लेलंड (MH-46-F-5573) या ट्रकची व्यवस्था केली होती. ट्रकचालक सुदामा घनश्याम किरार (रा. परवार, ता. फतेगढ, जि. गुना, म.प्र.) याच्याकडे साखर भरून सुपूर्त केली होती. मात्र, नियोजित ठिकाणी पोहोचण्याऐवजी ट्रकचालकाने साखर व ट्रकसह पलायन केले.
सदर प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 403/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 326(2), 316(4), 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंदताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे ट्रकचे लोकेशन व्यारा, जि. तापी (गुजरात) येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथकाने तातडीने कारवाई केली.
तपासादरम्यान अशोक लेलंड ट्रक (MH-16-F-5573) किंमत अंदाजे 20 लाख रुपये. साखरेच्या 430 गोण्या (एकूण वजन 21.5 टन) किंमत अंदाजे 8 लाख 50 हजार रुपयांचा याप्रकारे एकूण 28 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सुदामा घनश्याम किरार यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोसई समाधान सोळंके, पोना शरद अहिरे, पोकॉ संभाजी खरात, अमोल पडोळे, मच्छिंद्र कातखडे, जित पटारे, रामेश्वर तारडे, अमोल गायकवाड, सागर बनसोडे व मिरा सरग यांच्या तपास पथकाने केली. सदर प्रकरणाचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहाय्यक निरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.