श्रीरामपूर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार दिला असता, तर आज श्रीरामपूर मतदारसंघाचा आमदार भगवा आणि हिंदुत्वाचा पुरस्कर्ता, म्हणजेच शिवसेनेचा असता, अशी खंत शिवसेना शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केली. मात्र, पुढील निवडणुकीत ही चूक टाळली जाणार असून, आमदार शिवसेनेचाच होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर थत्ते मैदान येथे आयोजित खेळण्या-पाळण्यांच्या उद्घाटनप्रसंगी चौधरी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबईत जेंव्हा जेव्हा अहिल्यानगरचा विषय निघतो, तेंव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सागर बेग यांच्या कार्याचा उल्लेख आवर्जून करतात. सागर बेग यांच्या शिवसेनेत प्रवेशाने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली असून, त्यांच्या धर्मकार्याला आता शिवसेनेची बळकटी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात बोलताना सागर बेग यांनी, शहरातील श्रीरामनवमी यात्रोत्सवात पूर्वी ‘जिहादी’ प्रवृत्तीच्या लोकांना खेळण्या-पाळण्याचे ठेके देण्याची गलिच्छ पद्धत रूढ झाली होती, असा आरोप करत लव जिहादसारख्या घटनांना अशा गर्दीच्या ठिकाणी खतपाणी घालणारे हे प्रकार थांबवण्यासाठी त्यांनी अधिक रक्कम मोजून ठेका घेतल्याचे स्पष्ट केले. हिंदू मुलींना लक्ष्य करणाऱ्या या प्रवृत्तींना थारा न देता हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. या वेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हा सचिव दत्ताभाऊ खेमनर यांनी देखील विधानसभा निवडणुकीत चुकीच्या उमेदवाराला पाठबळ दिल्याने काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याची खंत व्यक्त केली. तसेच, सागर बेग यांच्यावर असलेली निष्ठा त्यांनी जाहीर केली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सागर बेग यांनी केला. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा सत्कार राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते अशोक रामा साळवे यांनी केला. नगरसेवक श्रीनिवास बिहानी, शिवसेना जिल्हाध्यक्ष औताडे, समीर माळवे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले. या यात्रोत्सवाच्या माध्यमातून हिंदुत्व, शिवसेनेची राजकीय दिशा आणि स्थानिक मतदारसंघात आगामी घडामोडींचा स्पष्ट संकेत देण्यात आला आहे.