शिर्डी (प्रतिनिधी) — आशिया खंडातील सर्वात मोठी मानली जाणारी साईबाबा संस्थान कर्मचारी सहकारी पतसंस्था सामाजिक बांधिलकीचे भान विसरत चालली आहे, असे स्पष्ट करणारी घटना नुकतीच समोर आली आहे. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी संस्थेने कोणताही औपचारिक कार्यक्रम न घेता हा विशेष दिन दुर्लक्षित केला. या निष्काळजीपणावर सामाजिक कार्यकर्ते अशोकराव लोंढे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्यामुळे भारतात समता, बंधुता आणि न्याय यांसारखी मूल्ये रुजली. अशा महामानवाच्या जयंतीला संस्थेने कोणताही साजरा न केल्याने संस्थेतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अशोकराव लोंढे यांनी स्पष्टपणे म्हटले की, “सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांकडून अशा प्रकारचा विसर खेदजनक आहे. डॉ. आंबेडकर यांची जयंती ही त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याची आणि नव्या पिढीमध्ये सामाजिक समतेचे बीज पेरण्याची संधी असते. ही संधी वाया घालवणे म्हणजे त्यांच्या कार्याचा अवमानच आहे.” या प्रकारामुळे संस्थेच्या सामाजिक भानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भविष्यात अशा गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी जागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. यासोबतच संस्थेने तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि पुढील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे योग्य रीतीने आयोजन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.