शिर्डी (प्रतिनिधी) – श्री साईबाबा संस्थानला नुकताच प्राप्त झालेल्या एका गंभीर धमकीच्या मेलनंतर श्री साईबाबा समाधी मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर देशभरात उच्चस्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, त्याचाच भाग म्हणून श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरातही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कडकाई करण्यात आली आहे. संस्थानच्या अधिकृत माहितीप्रमाणे, दिनांक 2 मे 2025 रोजी श्री साईबाबा संस्थानला एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ई-मेल प्राप्त झाला, ज्यामध्ये साईबाबा मंदिर स्फोटाने उडवून देण्याचा उल्लेख होता. ही बाब अत्यंत गंभीर मानून यंत्रणांनी तत्काळ तपास सुरू केला असून, संबंधित मेलची चौकशी केंद्रीय एजन्सी आणि सायबर क्राइम विभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, मंदिरात रोज होणारी भाविकांची मोठी गर्दी आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, संस्थानने 11 मे 2025 पासून पुढील आदेश येईपर्यंत समाधी मंदिरात हार, फुले, पुष्पगुच्छ, प्रसाद, शाल, चादर इत्यादी कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे. या निर्णयामुळे भक्तांना आपल्या श्रद्धेच्या विविध पद्धतींमध्ये काहीसा बदल करावा लागणार असला तरी, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यावश्यक असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने देश-विदेशातून साईभक्त शिर्डीत दाखल होत असतात. त्यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कठोर करण्यात आली असून, प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे.

संस्थानने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन करताना नमूद केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भर द्यावा. सुरक्षेच्या या विशेष उपाययोजनांमध्ये सीसीटीव्ही नियंत्रण, बम स्क्वॉडची तपासणी, श्वानपथक तैनात करणे, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, तपासणी यंत्रणा अधिक कार्यरत करण्यात आल्या आहेत. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्रत्येक भाविक सुरक्षितपणे दर्शन घेऊ शकेल, यासाठी आम्ही सज्ज आहोत. हा निर्णय केवळ तात्पुरता असून, परिस्थिती निवळल्यानंतर यासंबंधीचा पुढील निर्णय जाहीर केला जाईल.
”भाविकांनी संस्थानच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्सवर वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण मंदिर परिसरात सर्व यंत्रणा सतर्क असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियोजनबद्ध सुरक्षाव्यवस्था राबवली जात आहे. शिर्डीतील हा निर्णय केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता, देशभरातील भाविकांच्या श्रद्धेशी निगडित असल्यामुळे या निर्णयाला व्यापक प्रतिसाद आणि सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.