मुंबई – नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीचा कार्यक्रम बदलत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदान पूर्ण झाल्यानंतरच एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजीच मतमोजणी करावी, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या पूर्वी निश्चित केलेल्या मतमोजणीच्या तारखेला विराम मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने मूळ नियोजनानुसार ३ डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती. मात्र याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने मतमोजणी एका दिवशी घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले. न्यायालयाने मतदानाच्या दोन्ही टप्प्यांचे निकाल एकाच दिवशी जाहीर केल्यास पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राहील, असे मत व्यक्त केले.
एक्झिट पोलसाठीही विशेष निर्देश देत मतदान २० डिसेंबरला संपल्यानंतरच एक्झिट पोल जाहीर करता येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच या निवडणुकांसाठीची आदर्श आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांचे लक्ष आता २१ डिसेंबरकडे लागले आहे. या निर्णयामुळे निवडणूक रणनिती, राजकीय समीकरणे आणि प्रचार मोहीम यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




