प्रवरा नदीचे प्रदूषण आणि धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त हिंदू बांधवांचा आक्रोश
नेवासा (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र नेवासा नगरीमध्ये खुलेआम होणाऱ्या गोवंश कत्तलीचे प्रकार तसेच त्या कत्तलीनंतरचे रक्त मिश्रित पाणी थेट प्रवरा नदीत सोडले जात असल्याच्या धक्कादायक प्रकारांवर तातडीने बंदी घालावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन दिनकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना सविस्तर लेखी निवेदन सादर केले.
नेवासा ही संत ज्ञानेश्वर महाराज, भगवान मोहिनीराज आणि अनेक संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी आहे. अशा पवित्र भूमीवर गोवंशाची खुलेआम कत्तल होणे आणि त्याचे दुषित पाणी प्रवरा नदीत सोडले जाणे हे केवळ पर्यावरणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे या प्रकाराने हिंदू समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या असून परिसरात तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे.या प्रकरणी स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी यापूर्वीही वेळोवेळी आंदोलन आणि उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे पवित्र नेवासा नगरीमधील सर्व अवैध कत्तलखाने त्वरित बंद करून त्यांना जमीनदोस्त करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी केली आहे.
यासंदर्भात मा. विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या वेळी दक्षिण नगर जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंह, नगराध्यक्ष अभयराव आगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले असून गोवंश कत्तलीच्या विरोधातील ही लढाई पुढेही तीव्र स्वरूपात सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
