श्रीरामपुर/प्रतिनिधी:– जम्मू काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच काळात श्रीरामपूर, अहिल्यानगर व धुळे येथील तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेले असताना अचानक सुरू झालेल्या कर्फ्यूमुळे व विमानसेवा बंद झाल्यामुळे तेथे अडकले होते. यामध्ये १) पिंकी गुरु (श्रीरामपूर), २) काजल गुरु (अहिल्यानगर), ३) महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी (धुळे), ४) साक्षी जोगी (धुळे), ५) कल्याणी (अहिल्यानगर), ६) प्रीती (अहिल्यानगर) यांचा समावेश होता.
या तणावपूर्ण वातावरणात या तृतीयपंथी भगिनींनी व्हिडिओद्वारे महाराष्ट्र शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व माध्यमांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत ‘किन्नर माँ ट्रस्ट’च्या संचालिका सलमान खान यांनी या घटनेची माहिती लोकशाही न्यूज चॅनलमार्फत शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने या घटनेची गंभीर दखल घेतली.पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन तृतीयपंथी भगिनींना भेट दिली व त्यांना धीर देत परतीची सोय करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधत विमानाचे तिकीट, हॉटेल ते श्रीनगर विमानतळापर्यंत गाडीची सोय, तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेऊन संपूर्ण प्रवासात सतत संपर्कात राहून चौकशी केली. त्यांचे मुंबई आगमन सुरक्षित होईपर्यंत व तेथून श्रीरामपूर येथील त्यांच्या आश्रमात पोहोचेपर्यंत सर्व व्यवस्था उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आली.
या सर्व प्रयत्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, आमदार संग्राम भैय्या जगताप, आमदार अमित अग्रवाल, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर, मा. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, दिपालीताई ससाणे, जयश्रीताई थोरात, कलावती देशमुख, जयश्रीताई जगताप, जयेश सावंत, स्वप्निल सोनार, बंडूकुमार शिंदे, रविभाऊ, बाळासाहेब भांड, विशाल अंभोरे, कुणाल करंडे, मनोज नवले, अनिल बागुल, बाळासाहेब आगे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे, आम आदमीचे प्रवक्ते तिलक डुंगरवाल, पुष्पलता हरदास, राजेश अलग , श्रीनिवास बिहाणी, प्रकाश चित्ते, भारतीताई फंड , रवी पाटील तसेच श्रीरामपूर व धुळे परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आणि संस्थांनी मोलाचे योगदान दिले.
पिंकी गुरु (अध्यक्ष, तृतीयपंथी समाज सेवा संस्था, श्रीरामपूर) यांनी एक भावनिक संदेश देत सर्व संबंधितांचे व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “संकटाच्या काळात तुमच्या प्रार्थना व पाठिंब्यामुळे आम्ही सुखरूप घरी परतलो आहोत,” असे त्यांनी नमूद केले. ही घटना केवळ एका समाजघटकासाठी नव्हे, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून शासन आणि समाजाने दाखवलेल्या एकात्मतेचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे.